आशा व गटप्रवर्तक फेडरेशनच्या राज्य अधिवेशनाची वर्ध्यात जोरदार सुरू
वर्धा : सीटू संलग्न महाराष्ट्र आशा व गटप्रवर्तक फेडरेशन (Maharashtra Asha And Group Promoters) चे तिसरे अधिवेशन (Conference) आज वर्धा (Wardha) येथे मोठ्या उत्साहात सुरू झाले. अधिवेशनाची सुरुवात फेडरेशनच्या अध्यक्षा कॉ. आनंदी अवघडे यांनी सीटूचा झेंडा फडकवून केला. त्यावेळी शहीद स्मारकाला अभिवादन करण्यात आले.
अधिवेशनाचे उद्घाटन सीटूचे राष्ट्रीय सचिव व अंगणवाडी फेडरेशनच्या राष्ट्रीय अध्यक्षा कॉ. उषा राणी यांनी केली, यामध्ये त्यांनी पूर्ण देशभरात सीटू आशांना संघटित करण्यासाठी काय प्रयत्न करत आहेत याचा लेखाजोखा मांडत आशांच्या आरोग्य क्षेत्रातील विशेषत: करोना काळातील योगदानाचे कौतुक केले व केंद्र शासनाच्या धोरणावर टीका केली.
सीटूचे महासचिव कॉ. एम एच शेख यांनी मार्गदर्शन केले व सिटूच्या धोरणा बद्दल माहिती दिली. योजना कर्मचारी समन्वय समितीच्या निमंत्रक शुभा शमीम यांनी शासनाचे नागरिकांना सर्व मूलभूत सेवा देण्याचे घटनात्मक कर्तव्य आणि ते बजावण्याऱ्या आशा व गटप्रवर्तकांचे योगदानावर प्रकाश टाकला. तसेच शासनाने त्यांना शासकीय कर्मचारी घोषित करून वेतन श्रेणी लागू करावी अशी मागणी केली.
सीटूचे राज्यध्यक्ष डॉ. डी.एल. कराड यांनी आरोग्य क्षेत्रात शासनाने कसे चुकीचे खाजगीकरणाचे धोरण लागू केले आहे व पूर्वी शासकीय कर्मचारी ज्या सेवा देत होते, तिचे कामे आता योजना कर्मचाऱ्यांकडून कशी करून घेतली जात आहेत आणि त्यांचे शोषण केले जात आहे. या धोरणावर जोरदार प्रहार केला.
जनवादी महिला संघटनेच्या वतीने दुर्गा काकडे यांनी शुभेच्छा दिल्या व आशा, गटप्रवर्तकांना महागाई व महिलांच्या अन्य प्रश्नांवर महिला संघटनेत सामील होऊन लढा बुलंद करण्याचे आव्हान केले. अध्यक्षा आनंदी अवघडे यांनी अध्यक्षीय समारोप केला व अर्चना घुगरे यांनी आभार मानले.
दुसऱ्या प्रतिनिधी सत्रात सर्वप्रथम फेडरेशनच्या सचिव कॉ. पुष्पा पाटील यांनी गेल्या चार वर्षाचा अहवाल मांडला. आशांच्या दोन्ही संपात सीटूने खंबीर भूमिका घेतल्यामुळे आणि आशांनी राज्यभरात केलेल्या आंदोलनामुळे त्यांच्या मानधनात वाढ झाल्याचे नमूद करत सीटूची संघटना संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचवण्याचे व सर्व आशांमध्ये सीटूच्या लढाऊ व प्रमाणिक कार्यपध्दती रूजवण्याचे आवाहन केले.
याची सदस्यता घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा