आमदार अमित गोरखे लिखित 'आधुनिक भारताचे शिल्पकार : युगप्रवर्तक डॉ. बाबासाहेब आंबेडकर' पुस्तकाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण


डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा वारसा पुढे नेणारे पुस्तक; आमदार अमित गोरखे यांच्या अभ्यासूवृत्तीवर मुख्यमंत्र्यांची कौतुकाची थाप!

पिंपरी चिंचवड : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे समता, स्वातंत्र्य आणि बंधुतेचे विचार नव्या पिढीपर्यंत पोहोचवणे, हे काळाची गरज आहे. याच उदात्त हेतूने आमदार अमित गोरखे यांनी शब्दांकित केलेल्या ‘आधुनिक भारताचे शिल्पकार : युगप्रवर्तक डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ या पुस्तकाचे प्रकाशन आज पुणे येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाले.

राज्याचे मुख्यमंत्री माननीय श्री. देवेंद्रजी फडणवीस आणि केंद्रीय राज्यमंत्री माननीय श्री. मुरलीधरजी मोहोळ यांच्या शुभहस्ते या पुस्तकाचे लोकार्पण करण्यात आले.

पुस्तक सकारात्मक परिवर्तन घडवून आणणारे

पुस्तकाच्या प्रकाशनप्रसंगी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार हे केवळ एका काळापुरते मर्यादित नसून ते अनंत काळासाठी मार्गदर्शक आहेत. आमदार अमित गोरखे यांनी अत्यंत अभ्यासूवृत्तीने बाबासाहेबांच्या कार्याचा आढावा या पुस्तकात घेतला आहे. समता आणि बंधुतेचा हा विचार समाजात सकारात्मक परिवर्तन घडवून आणण्यासाठी नक्कीच उपयुक्त ठरेल.

डॉ, बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार माझ्या जीवनाचे प्रेरणास्थान

या प्रसंगी आपली भूमिका मांडताना आमदार अमित गोरखे म्हणाले, ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे आधुनिक भारताचे खरे निर्माते आहेत. त्यांचे विचार माझ्या जीवनाचे प्रेरणास्थान राहिले आहेत. बाबासाहेबांनी दिलेली समता, स्वातंत्र्य आणि बंधुतेची शिकवण जनमानसात, विशेषतः तरुणांमध्ये अधिक प्रभावीपणे रुजावी, या भावनेतून मी या पुस्तकाचे लेखन केले आहे. माझ्या लेखणीतून मांडलेला हा विचारांचा दीप समाजाला नवी दिशा देणारा ठरेल, असा मला विश्वास आहे.’

पुस्तकाचे वैशिष्ट्य

या पुस्तकामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या सामाजिक क्रांतीसोबतच त्यांचे आर्थिक विचार, राष्ट्र उभारणीतील योगदान आणि संविधानाच्या माध्यमातून त्यांनी दिलेला समतेचा संदेश सोप्या भाषेत मांडण्यात आला आहे. हे पुस्तक केवळ एक चरित्र नसून बाबासाहेबांच्या अर्थशास्त्र, जलव्यवस्थापन, वीज निर्मिती आणि कामगार कल्याण यांसारख्या दुर्लक्षित राहिलेल्या पैलूंवर सखोल भाष्य करते. प्रा. डॉ. वैभव ढमाळ यांनी या पुस्तकाची प्रस्तावना लिहिली असून, त्यांनी बाबासाहेबांना 'भविष्याचा शोध घेणारा महामानव' असे संबोधले आहे. यात 'महु ते महामानव' या संघर्षापासून ते 'चिरंतन बाबासाहेब' या प्रवासापर्यंतचा प्रत्येक टप्पा अत्यंत प्रभावीपणे मांडला आहे.

या पुस्तकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्त्रीमुक्तीसाठी केलेले प्रयत्न आणि कामगारांना मिळवून दिलेले ८ तासांच्या कामाचे हक्क, यावर विशेष प्रकाश टाकण्यात आला आहे. लेखक अमित गोरखे यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केल्याप्रमाणे, आजच्या तरुण पिढीला बाबासाहेबांचे 'संवैधानिक नैतिकता' आणि 'धम्म विचार' सुस्पष्टपणे समजावेत, या उद्देशाने या पुस्तकाची निर्मिती करण्यात आली आहे. 

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे राजकीय नेतृत्व हे केवळ सत्ता मिळवण्यासाठी नव्हते, तर ते समाजातील शेवटच्या घटकाला 'राजकीय सत्ता' हे प्रगतीचे साधन म्हणून मिळवून देण्यासाठी होते. त्यांच्या मते, जोपर्यंत शोषित वर्ग सत्तेच्या चाव्या हातात घेत नाही, तोपर्यंत सामाजिक गुलामगिरी नष्ट होणार नाही. रिझर्व्ह बँकेची स्थापना असो वा देशातील मोठे धरण प्रकल्प, या सर्वांच्या मुळाशी बाबासाहेबांचे विचार कसे आहेत, हे या पुस्तकातून सिद्ध होते.

हे पुस्तक केवळ दलितांच्या कैवाऱ्याची कथा नसून, एका आधुनिक आणि विज्ञानवादी भारताची निर्मिती करणाऱ्या जागतिक दर्जाच्या नेत्याची गाथा आहे. सामाजिक कार्यकर्ते, विद्यार्थी आणि अभ्यासकांसाठी हा ग्रंथ एक अनमोल ठेवा ठरणार आहे.

थोडे नवीन जरा जुने