नवी दिल्ली (वर्षा चव्हाण) : भारतासाठी एक ऐतिहासिक आणि उत्साहवर्धक बातमी समोर आली आहे. देशाच्या अंदमान समुद्रात तब्बल 2 लाख कोटी लिटर कच्च्या तेलाचे भांडार सापडल्याची घोषणा केंद्र सरकारने केली आहे. पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी यासंदर्भात अधिकृत माहिती दिली असून, हा साठा जर पूर्णपणे प्रमाणित झाला आणि व्यावसायिकदृष्ट्या उपयुक्त ठरला, तर भारताच्या आर्थिक भविष्याला एक नवा वेग आणि दिशा मिळू शकते.
आर्थिक उलथापालथीचा शक्यतो मोठा टप्पा
पेट्रोलियम मंत्र्यांच्या मते, हा कच्च्या तेलाचा साठा गयानामध्ये अलीकडेच सापडलेल्या 11.6 अब्ज बॅरल तेलाच्या साठ्याइतका मोठा असू शकतो. भारताचा सध्याचा जीडीपी सुमारे 3.7 ट्रिलियन डॉलर्स असून, जर ही ऊर्जा संपत्ती पूर्ण क्षमतेने वापरात आणली गेली, तर जीडीपी 20 ट्रिलियन डॉलर्सवर पोहोचू शकतो, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
'ओएनजीसी'ची विक्रमी कामगिरी
या शोधामागे सरकारी मालकीची ऊर्जा क्षेत्रातील दिग्गज कंपनी ओएनजीसी (ONGC) आहे. त्यांनी 2024 आर्थिक वर्षात 541 विहिरी खोदल्या, जी गेल्या ३७ वर्षांतील सर्वात मोठी संख्या आहे. यामुळे संशोधन आणि उत्पादन दोन्ही क्षेत्रात भारताने एक मोठी झेप घेतली आहे.
तेल आयातीत घट आणि स्वावलंबी भारत
भारत सध्या आपल्या गरजेपैकी सुमारे 85% कच्चे तेल आयात करतो. त्यामुळे तेलाच्या किमतींवर आणि जागतिक बाजारपेठेतील चढ-उतारांवर भारताचे अर्थव्यवस्थेवर मोठे परिणाम होतात. परंतु, अंदमानमध्ये सापडलेले हे भांडार जर प्रत्यक्ष उत्पादनात आले, तर भारताची परावलंबित्वाची साखळी तुटेल आणि देश ऊर्जेच्या बाबतीत स्वावलंबी होऊ शकतो.
या साठ्याचे व्यावसायिक महत्त्व, उत्पादन खर्च, पर्यावरणीय परिणाम, तसेच प्रकल्पासाठी लागणाऱ्या भौगोलिक आणि तांत्रिक अडचणी यांचा सविस्तर अभ्यास करावा लागणार आहे. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, उत्पादन प्रक्रियेला सुरुवात होण्यासाठी किमान ३ ते ५ वर्षांचा कालावधी लागू शकतो.