छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 किल्ल्यांना युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत स्थान

12 forts of Chhatrapati Shivaji Maharaj included in UNESCO World Heritage List

UNESCO World Heritage List : महाराष्ट्राच्या इतिहासाला आणि सांस्कृतिक वारशाला जागतिक स्तरावर मान्यता मिळाली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेल्या 12 किल्ल्यांचा समावेश युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत (UNESCO World Heritage List) नुकताच करण्यात आला आहे. ही घटना 11 जुलै 2025 रोजी पॅरिस येथे झालेल्या युनेस्कोच्या जागतिक वारसा समितीच्या 47व्या सत्रात घडली. ‘मराठा लष्करी भूप्रदेश’ (Maratha Military Landscapes) या संकल्पनेअंतर्गत या किल्ल्यांना हा सन्मान मिळाला असून, यामुळे महाराष्ट्रातील ऐतिहासिक आणि सांस्कृतिक ठेव्याला आंतरराष्ट्रीय पातळीवर मान्यता मिळाली आहे.

युनेस्कोच्या यादीत समाविष्ट किल्ले

या यादीत महाराष्ट्रातील 11 आणि तामिळनाडूतील 1 अशा एकूण 12 किल्ल्यांचा समावेश आहे. हे किल्ले मराठा साम्राज्याच्या लष्करी रणनीती आणि स्थापत्यकलेतील उत्कृष्टतेचे प्रतीक आहेत. 

या किल्ल्यांचा समावेश

शिवनेरी (पुणे, शिवाजी महाराजांचा जन्मस्थान), साल्हेर (नाशिक), लोहगड (पुणे), खांदेरी (रायगड), रायगड (रायगड, मराठा साम्राज्याची राजधानी), राजगड (पुणे), प्रतापगड (सातारा), सुवर्णदुर्ग (रत्नागिरी), पन्हाळा (कोल्हापूर), विजयदुर्ग (सिंधुदुर्ग), सिंधुदुर्ग (सिंधुदुर्ग), जिंजी किल्ला (तामिळनाडू) हे किल्ले छत्रपती शिवाजी महाराजांच्या ‘हिंदवी स्वराज्या’च्या संकल्पनेचे आधारस्तंभ होते. यातील प्रत्येक किल्ला मराठ्यांच्या शौर्य, बलिदान आणि रणनीतीचे साक्षीदार आहे.

युनेस्कोच्या मानांकनाची प्रक्रिया

या किल्ल्यांना जागतिक वारसा स्थळाचा दर्जा मिळवून देण्यासाठी भारत सरकार, महाराष्ट्र सरकार, पुरातत्व विभाग आणि सांस्कृतिक मंत्रालय यांनी एकत्रित प्रयत्न केले. महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी पॅरिस येथे युनेस्कोच्या महासंचालकांशी भेट घेऊन तांत्रिक सादरीकरण केले. तसेच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत या प्रस्तावाला पाठबळ दिले.

फेब्रुवारी 2025 मध्ये आशिष शेलार यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने पॅरिसला भेट दिली आणि ‘मराठा लष्करी भूप्रदेश’ या संकल्पनेअंतर्गत या किल्ल्यांचे महत्त्व सादर केले. या प्रयत्नांना यश आले आणि 20 देशांनी भारताच्या बाजूने मतदान करून या किल्ल्यांना जागतिक वारसा स्थळाचा दर्जा दिला.

महाराष्ट्रातील उत्सवाचे वातावरण

या ऐतिहासिक यशामुळे महाराष्ट्रात आनंदाचे वातावरण आहे. पुण्यात कसबा पेठ येथे नागरिकांनी पारंपरिक वेशभूषा आणि भगव्या फेट्यांसह मिठाई वाटून आणि फटाक्यांच्या आतषबाजीने उत्सव साजरा केला. “जय भवानी, जय शिवाजी!” अशा घोषणांनी हा परिसर दणाणून गेला.

12-forts-of-Chhatrapati-Shivaji-Maharaj-included-in-UNESCO-World-Heritage-List

थोडे नवीन जरा जुने