पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड शहरातील कामगारनगरीमध्ये राहणाऱ्या कामगाराचा मुलगा कबीरजी राहुल कांबळे यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) परीक्षेत संपूर्ण भारतात 125 वा क्रमांक मिळवून घवघवीत यश संपादन केले आहे. या ऐतिहासिक कामगिरीबद्दल शिवशाही व्यापारी संघाचे संस्थापक अध्यक्ष युवराज दाखले यांनी कबीरजी कांबळे व त्यांच्या कुटुंबियांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.
यावेळी युवराज दाखले म्हणाले, "कष्टकरी कामगाराच्या घरातून आलेला मुलगा देशातील सर्वात कठीण परीक्षेत 125 वा रँक मिळवतो ही पिंपरी-चिंचवड व संपूर्ण बहुजन समाजासाठी अभिमानाची बाब आहे. कबीरजी यांनी दाखवून दिले की गरिबी, परिस्थिती व संसाधनांचा अभाव हा यशाचा अडथळा ठरू शकत नाही. भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर, आद्यक्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे, साहित्य रत्न लोकशाहीर डॉ अण्णा भाऊ साठे व इतर बहुजन समाजातील महापुरुषांचा वारसा चालवणारा हा खरा लेक आहे."
"कबीर राहुल कांबळे हे लाखो विद्यार्थ्यांसाठी प्रेरणास्थान आहेत. कामगारनगरीतील सर्व सामान्य घरातून दिल्लीच्या नॉर्थ ब्लॉकपर्यंतचा हा प्रवास थक्क करणारा आहे. आई-वडिलांनी कष्ट करून, मोलमजुरी करून मुलाला शिकवले आणि मुलाने त्यांचे स्वप्न पूर्ण केले. यापेक्षा मोठा आनंद काय असू शकतो?" असे युवराज दाखले यांनी सांगितले.
युवराज दाखले पुढे म्हणाले, "शिवशाही व्यापारी संघ व हिंदू मातंग सेनेच्या वतीने कबीरजी कांबळे यांचा लवकरच जाहीर नागरी सत्कार करण्यात येईल. तसेच शहरातील UPSC, MPSC ची तयारी करणाऱ्या होतकरू विद्यार्थ्यांसाठी कबीरजींचे मार्गदर्शन शिबीर आयोजित केले जाईल.
आपल्या बहुजन समाजातील मुलांनी कलेक्टर, एसपी, कमिशनर व्हावे हे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर,क्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे,सा. लो. डॉ.अण्णा भाऊ साठे यांचे स्वप्न कबीरजींनी साकार केले आहे."
