नारायणगाव (रफिक शेख) : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या नारायणगाव आगाराला तब्बल पाच नवीन 'जिजाऊ' बस उपलब्ध झाल्याने ग्रामीण भागातील प्रवासी, विद्यार्थी आणि सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. या बसांमुळे परिसरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम, सुरक्षित आणि सुविधायुक्त होण्यास मदत होणार आहे.
या नवीन बस नारायणगाव आगाराला मिळवून देण्यासाठी आमदार शरददादा सोनवणे आणि शिवसेना तालुकाप्रमुख बाबूभाऊ पाटे यांनी विशेष प्रयत्न केले. त्यांच्या पाठपुराव्यामुळे आगाराच्या ताफ्यात पाच नव्या बसांची भर पडली असून, प्रवाशांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
नवीन बसांचे उद्घाटन जिल्हा परिषद सदस्या सौ. नेहाताई पाटे तसेच पंचायत समिती सदस्या सुषमा ताई वाव्हळ यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे अधिकारी, कर्मचारी, शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उद्घाटनानंतर या सर्व 'जिजाऊ' बस ग्रामीण भागातील विविध मार्गांवर प्रवाशांच्या सेवेसाठी दाखल करण्यात येणार आहेत. विशेषतः विद्यार्थी, शेतकरी, महिला आणि रोजंदारीसाठी प्रवास करणाऱ्या नागरिकांना या बसांमुळे अधिक चांगली आणि नियमित वाहतूक सुविधा उपलब्ध होणार आहे.
नारायणगाव परिसरातील वाढती प्रवासी संख्या लक्षात घेता एसटीच्या ताफ्यात नव्या बसांची भर पडणे ही महत्त्वाची बाब असून, त्यामुळे ग्रामीण वाहतुकीला नवी चालना मिळणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
