पिंपरी चिंचवड (किशोर थोरात) : देशातील अत्यंत महत्त्वाची मानली जाणारी NEET परीक्षा पुन्हा एकदा पेपरफुटीच्या आरोपांमुळे चर्चेत आली असून, या प्रकारामुळे तब्बल २२ लाख विद्यार्थ्यांच्या मेहनतीवर पाणी फेरले गेले आहे. वर्षानुवर्षे अभ्यास करून, दिवस-रात्र मेहनत घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळण्याचे काम काही भ्रष्ट आणि पैशासाठी हव्यास असलेल्या टोळ्यांकडून होत आहे, ही अत्यंत गंभीर आणि संतापजनक बाब आहे. |
आज शिक्षण क्षेत्रात गुणवत्ता, प्रामाणिकपणा आणि विद्यार्थ्यांचे कष्ट यापेक्षा पैशांचा बाजार मोठा होत चालला आहे. लाखो रुपये घेऊन पेपर विकले जात असतील, परीक्षा व्यवस्थेत भ्रष्टाचार होत असेल, तर सामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांनी न्याय कुठे मागायचा? अशा घटनांमुळे विद्यार्थ्यांचा मानसिक ताण वाढत असून, त्यांच्या भविष्याबाबत असुरक्षिततेची भावना निर्माण होत आहे.
सरकारने आता केवळ चौकशीच्या घोषणा न करता पेपरफुटी करणाऱ्या मुख्य सूत्रधारांवर कठोर कारवाई करणे आवश्यक आहे. अशा गुन्ह्यांना देशद्रोहासमान मानून कठोर शिक्षा, आर्थिक दंड आणि आयुष्यभरासाठी शिक्षण क्षेत्रातून बंदी यांसारखे निर्णय घेण्याची वेळ आली आहे.
आजची तरुण पिढी देशाचे भविष्य आहे. जर शिक्षण व्यवस्थेवरील विश्वासच ढासळला, तर देशाच्या प्रगतीवर त्याचा गंभीर परिणाम होईल. त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारने परीक्षा प्रणाली अधिक पारदर्शक, सुरक्षित आणि तंत्रज्ञानाधारित करण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात.
विद्यार्थ्यांच्या कष्टांचा, पालकांच्या त्यागाचा आणि देशाच्या भविष्याचा असा खेळ थांबला पाहिजे. समाजातील सर्व घटकांनी याविरोधात आवाज उठवणे ही काळाची गरज आहे.
