पिंपरी दि. २४ (क्रांतिकुमार कडूलकर) : जिजाऊ माँसाहेबांनी पुण्यात सोन्याचा नांगर फिरवून पुणे शहराला वसवले. राजमाता जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्याची आणि सामाजिक न्यायाची शिकवण दिली. उध्वस्त झालेल्या पुण्याचं पुनर्वसन करण्याचा आणि रयतेत नविन आत्मविश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न केला, त्यांनी स्त्री-शक्तीचे प्रतीक म्हणून आणि एक दूरदृष्टी असलेल्या नेत्या म्हणून समाजाला दिशा दाखवली. त्यांचे नाव पुणे रेल्वे स्टेशनला देण्यात यावे अशी मागणी कामगारांनी केली.
कष्टकरी संघर्ष महासंघातर्फे आज जिजाऊंचा नाव देणे बाबत कामगारांनी आग्रही मागणी केली. यावेळी कामगार नेते काशिनाथ नखाते, प्रदेश सचिव तुषार घाटूळे उपाध्यक्ष राजेश माने, मनपा सदस्य सलीम डांगे, रंजना तुरुकमारे, उषा लांडगे, लता धुळे, नयन तोडकर, भाग्यश्री माने, यास्मिन तांबोळी, सुनिता भोले, रेशमा काटे उपस्थित होते.
नखाते म्हणाले की, राजमाता जिजाऊ यांच्या नाव रूपाने केवळ ऐतिहासिक स्मृतींना उजाळा देणार नाही, तर स्वराज्य स्थापना आणि सामाजिक एकतेचा संदेशही देईल. त्यांच्या सद्गुण, शौर्य आणि दूरदृष्टीसाठी ओळखल्या जात होत्या. पुणे येथील आपल्या पतीची जहागीर त्यांनी समर्थपणे चालवून त्याचा विकास केला. कसबापेठ गणपती मंदिराची स्थापना केली. तसेच तांबडी जोगेश्वरी मंदिराचा जीर्णोद्धार केला.
नामांतराच्या वादात इतिहासाचा सन्मान आणि आजच्या मूल्यांचा मेळ घालणे महत्त्वाचे आहे. जिजाऊंचा वारसा हा सर्वसमावेशक आहे; त्यांनी जाती-धर्माच्या पलीकडे जाऊन स्वराज्याचे स्वप्न पाहिले. त्यांचे नाव निवडणे म्हणजे पुण्यासारख्या सांस्कृतिक आणि शैक्षणिक केंद्रातून समता आणि सक्षमीकरणाचा विचार पुढे नेणे होय.