Budget 2026 : केंद्रीय अर्थसंकल्प कष्टकरी, रुग्ण आणि मध्यमवर्गीयांना दिलासा देणारा; डॉ. बाबा कांबळे यांनी केले स्वागत


पिंपरी चिंचवड (क्रांतीकुमार कडुलकर) :  केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज सादर केलेला २०२५-२६ चा अर्थसंकल्प हा सामान्य जनतेच्या खिशाला आणि आरोग्याला प्राधान्य देणारा आहे. कर्करोगासह दुर्मिळ आजारांची औषधे स्वस्त करणे आणि TCS मध्ये कपात करण्याच्या निर्णयामुळे कष्टकरी व मध्यमवर्गीयांना मोठा दिलासा मिळाला आहे, अशी सकारात्मक प्रतिक्रिया कष्टकरी जनता आघाडी व ऑटो टॅक्सी ट्रान्सपोर्ट फेडरेशन ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बाबा कांबळे यांनी व्यक्त केली.

डॉ. बाबा कांबळे यांनी या अर्थसंकल्पातील महत्त्वाच्या तरतुदींचे स्वागत करताना प्रशासकीय व आर्थिक बदलांचे विश्लेषण केले.

अर्थसंकल्पातील 'हे' निर्णय स्वागतार्ह - डॉ. बाबा कांबळे:

 रुग्णांना मोठा आधार: कॅन्सरवरील १७ औषधे आणि ७ दुर्मिळ आजारांच्या औषधांवरील आयात शुल्क (Basic Customs Duty) पूर्णपणे माफ करण्याचा निर्णय ऐतिहासिक आहे. यामुळे मधुमेहासारख्या आजारांवरील उपचारांचा खर्चही कमी होऊन लाखो कुटुंबांना दिलासा मिळेल.

  TCS मध्ये मोठी कपात: परदेश प्रवास पॅकेज, शिक्षण आणि वैद्यकीय उपचारांसाठी बाहेर पैसे पाठवताना लागणारा TCS २० टक्क्यांवरून थेट २ टक्क्यांवर आणला आहे. हे मध्यमवर्गीय विद्यार्थी आणि पालकांसाठी अतिशय फायदेशीर ठरेल.

  पर्यावरणपूरक इंधन व ऊर्जा: सीएनजी (CNG), बायोगॅस, सोलर एनर्जी उपकरणे आणि बॅटरीवरील आयात शुल्कात सवलत दिल्याने इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढेल. यामुळे वाहन चालकांचा इंधन खर्च कमी होण्यास मदत होईल.

 निर्यात व व्यापाराला चालना: चामडे, कापड आणि मच्छीमारांच्या उत्पादनांची निर्यात सुलभ व स्वस्त केल्यामुळे या क्षेत्रातील कष्टकरी वर्गाला रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होतील. तसेच कुरिअर सेवा स्वस्त झाल्याचा फायदा छोट्या व्यापाऱ्यांना होईल.

'विकसित भारत'च्या दिशेने पाऊल:

प्रतिक्रिया देताना डॉ. बाबा कांबळे पुढे म्हणाले की, "हा अर्थसंकल्प 'विकसित भारत २०४७' च्या संकल्पनेला बळकटी देणारा आहे. सरकारने केवळ मोठ्या उद्योगांचा विचार न करता कष्टकरी, शेतकरी, मच्छीमार आणि मध्यमवर्गीयांच्या मूलभूत गरजांना स्पर्श केला आहे. आता या घोषणांची अंमलबजावणी तितक्याच गतीने जमिनीवर होणे आवश्यक आहे, जेणेकरून शेवटच्या माणसापर्यंत याचा लाभ पोहोचेल."

दैनिक गरजांच्या वस्तू जसे की बूट-चप्पल आणि घरगुती उपकरणांवरील सवलतींमुळे सर्वसामान्यांचे जीवनमान सुसह्य होईल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.


थोडे नवीन जरा जुने