विकृत प्रकरणात पंतप्रधानांचे नाव आपण सहन करतो हा आपल्या सहनशीलतेचा पराकोट - हर्षवर्धन सपकाळ

 


"कॉक्रोच पार्टी" निर्माण होणे हे तरुण विचारांच्या संघटनांचे फेल्युअर - हर्षवर्धन सपकाळ 

फुले, गांधी, नेहरू विचारमंचच्या  "महात्मा गांधी आणि राष्ट्रवाद" या व्याख्यानाचे समारोप पुष्प 

पिंपरी चिंचवड :  एफस्टिन फाईल सारख्या विकृत प्रकरणात आपल्या पंतप्रधानांचे नाव असल्यावरही आपण त्यांना सहन करतोय, हा आपल्या सहनशीलतेचा पराकोट आहे. आता रस्त्यावर सविनय उतरल्याशिवाय, सत्याग्रहाशिवाय कोणताही मार्ग दिसत नाही. आता आपण दुसऱ्या स्वातंत्र्य लढ्याला तयार आहोत का ? या प्रश्नाचे सगळ्यांनी चिंतन करावे. जर आपण जिवंत असाल, मेलेलो नाही अशी स्वतःला खात्री असेल तर आता सर्वजण कृतिशील होऊन काहीतरी करू या असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केले.

     रविवारी (दि. २४ मे) पिंपरी येथे फुले, गांधी, नेहरू विचारमंच च्या वतीने आयोजित केलेल्या "महात्मा गांधी आणि राष्ट्रवाद" या विषयावर आयोजित केलेल्या व्याख्यानात समारोपाचे पुष्प गुंफताना सपकाळ बोलत होते. यावेळी सेवाग्राम आश्रमाचे सचिव व जेष्ठ गांधीवादी विचारवंत विजय तांबे, आयोजक दाहर मुजावर, अक्षय शहरकर, केनिथ रेमी तसेच विष्णू नेवाळे, अशोक मोरे, अमरसिंह नाणेकर, मिलिंद फडतरे, किरण खाजेकर, मयूर जैस्वाल, गौरव चौधरी, अनिरुद्ध कांबळे, नरेंद्र बनसोडे, हभप सांगोळे, चैतन्य रणदिवे, महेश पाटील, बाबासाहेब पाटील, गिरिजा कुदळे, सायली नढे, जीविका उठाडा, संदेश भंडारी, महालिंग स्वामी, यशराज पारखी, मॅन्युअल डिसोझा, निक्सन ऑगस्टीन, इरफान शेख, बसवराज कंजे, जिंदा सांडभोर, सूरज कुलकर्णी, सचिन दुरगुडे, वैजनाथ शिरसाठ, अनिल कदम, मनोज ढकोलिया, मंगेश मोरे, राजू शेख, अल्ताफ शेख, सुर्यकांत जाधव, किरण नढे आदी उपस्थित होते.

     यावेळी सपकाळ यांनी सांगितले की, "राष्ट्र" म्हणजे मी, माझी जात, माझा धर्म असा उलटा प्रवास सध्या सुरू आहे. अशा संकुचित विचारात, कोशात "राष्ट्र" ही भावना सध्या वाढत आहे. पेट्रोल, डिझेल २०० रुपये प्रति लिटर प्रमाणे मिळाले तरी चालेल पण मोदी, भाजप पाहिजे अशा विचारांची लोक आहेत ही मानसिक दिवाळीखोरी आहे. याला जबाबदार आपण आहोत असे मानणारा मी एक कार्यकर्ता आहे. "कॉक्रोच पार्टी" निर्माण होणे हे आपल्यासारख्या तरुण विचारांच्या संघटनांचे फेल्युअर आहे. 

अशा प्रकारची पार्टी निर्माण होते ज्यात आक्रोश आहे. आपला मेंदू पुन्हा गुलाम करण्याची प्रक्रिया सुरू आहे, आणि हे बहुतेकांना आवडतं त्यांना कम्फर्ट झोन मध्ये राहायचं आहे. यात बदल झाल्याशिवाय कोणतीही क्रांती होऊ शकत नाही. सध्या कार्यकर्ते, नागरिक म्हणून नाहीत तर निरीक्षक परीक्षक, समीक्षक, उपदेशक, मार्गदर्शक आणि पर्यवेक्षक याच भूमिकेत राहायची बहुतांश लोकांची इच्छा आहे. आपल्यात एक वाक्यता नाही प्रत्येकामध्ये "मी" पणा आहे. आपण सर्वांनी आता कृतीशील झाले पाहिजे. फुले, नेहरू, गांधी यांना अभिप्रेत असणारा राष्ट्रवाद साठी सत्याग्रह केला पाहिजे असे आवाहन करून हर्षवर्धन सपकाळ यांनी व्याख्यानाचा समारोप केला.

   स्वागत अक्षय शहरकर, केनिथ रेमी यांनी केले आणि सूत्र संचालन दाहर मुजावर यांनी केले.


थोडे नवीन जरा जुने