३० भजनी मंडळांतील सुमारे ३०० महिलांचा सहभाग; भारतीय संस्कृती आणि अध्यात्म संवर्धनाचा प्रेरणादायी उपक्रम
वार्ताहर : शिवानंद चौगुले
PCMC
चिंचवड (शिवानंद चौगुले : स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळ अंतर्गत कार्यरत संस्कृती संवर्धन व विकास महासंघ, पिंपरी-चिंचवड तसेच चिंचवड गाव भजनी मंडळ महासंघाच्या संयुक्त विद्यमाने अधिक ज्येष्ठ मासाच्या पावन पर्वानिमित्त आयोजित करण्यात आलेला पंचकुंडीय विष्णू गायत्री याग व गोपूजन सोहळा अत्यंत भक्तिमय, उत्साहपूर्ण आणि संस्कारमय वातावरणात संपन्न झाला. हा कार्यक्रम चिंचवड येथील महाराणा प्रताप गोशाळा, पुनरुत्थान गुरुकुल येथे बुधवार, दि. १० जून रोजी आयोजित करण्यात आला होता.
भारतीय संस्कृतीतील यज्ञ, गोसेवा आणि सामूहिक भक्ती परंपरेचे जतन व संवर्धन करण्याच्या उद्देशाने आयोजित या उपक्रमाला परिसरातील सुमारे ३० भजनी मंडळांमधील जवळपास ३०० महिला भगिनींचा उत्स्फूर्त सहभाग लाभला. उपस्थित महिलांच्या पारंपरिक वेशभूषेमुळे आणि मंत्रोच्चारांच्या निनादामुळे संपूर्ण परिसर भक्तिरसाने भारावून गेला होता.
कार्यक्रमाची सुरुवात मंगलमय शंखनाद आणि सामूहिक प्रार्थनेने करण्यात आली. अखिल विश्व गायत्री परिवाराशी संलग्न असलेले श्री. राजेंद्र देसले व त्यांच्या सहकाऱ्यांनी गुरुवंदना, षट्कर्म आणि देवतांचे आवाहन करून यज्ञविधीची शास्त्रोक्त सुरुवात केली. यानंतर श्रीमती प्रियाताई जोग व सहकारी यांनी विष्णू सहस्त्रनाम स्तोत्राचे भावपूर्ण पठण केले.
पंचकुंडीय विष्णू गायत्री यागामध्ये भगवान विष्णूच्या १०८ पवित्र नामांचा उच्चार करत आहुत्या अर्पण करण्यात आल्या. त्याचबरोबर तुळजाभवानी स्तोत्र आणि अन्नपूर्णा स्तोत्राचे सामूहिक पठण करण्यात आले. वातावरणात दुमदुमणाऱ्या y
यज्ञानंतर सर्व महिला भगिनींनी गोमातेचे विधीवत पूजन करून भारतीय संस्कृतीतील गोसेवेचे महत्त्व अधोरेखित केले. त्यानंतर आरती करण्यात आली आणि महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली.
या संपूर्ण उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सौ. माधुरी कवी, सौ. उज्वला कवडे, श्रीमती अश्विनी नाटेकर, सौ. सुषमा वैद्य, डॉ. अजित जगताप तसेच सर्व भजनी मंडळांच्या पदाधिकारी व सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.
अधिक ज्येष्ठ मासाच्या निमित्ताने आयोजित या सामूहिक धार्मिक उपक्रमामुळे समाजात अध्यात्म, संस्कार, एकात्मता आणि भारतीय परंपरांप्रती असलेली निष्ठा अधिक दृढ होत असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. महिला शक्तीच्या सहभागातून संस्कृती संवर्धनाचे कार्य प्रभावीपणे पुढे नेण्याचा संदेश या कार्यक्रमातून समाजासमोर देण्यात आला.

