मुंबई : महाराष्ट्र विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन येत्या ३० जून ते १८ जुलै २०२५ या कालावधीत मुंबई येथे पार पडणार असल्याची घोषणा आज विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत करण्यात आली. विधान भवन, मुंबई येथे झालेल्या या बैठकीत अधिवेशनाच्या कालावधीबाबत निर्णय घेण्यात आला असून, यंदाचे अधिवेशन तीन आठवड्यांपर्यंत चालणार आहे.
विधानभवन येथे आयोजित विधानमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीला विधान परिषद सभापती प्रा.राम शिंदे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, उच्च व तंत्र शिक्षण व संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत (दादा) पाटील, माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, विधानसभा सदस्य दीपक केसरकर, भास्कर जाधव, नितीन राऊत, जितेंद्र आव्हाड, अमीन पटेल, विधानपरिषद सदस्य भाई जगताप, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, श्रीकांत भारतीय व संबंधित अधिकारी उपस्थित होते. यावेळी अधिवेशनाच्या कामकाजाबाबत सविस्तर चर्चा झाली.
महाराष्ट्र विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन हे राज्यातील विविध सामाजिक, आर्थिक आणि राजकीय मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी महत्त्वाचे व्यासपीठ आहे. या अधिवेशनादरम्यान विरोधी पक्ष सरकारला राज्यातील विविध समस्यांवर प्रश्न विचारण्याची संधी मिळते, तर सरकारला आपली भूमिका आणि धोरणे जनतेसमोर मांडता येतात. यंदा विशेषतः मराठा आरक्षण, दुष्काळ, शेती आणि हिंदी सक्तीच्या मुद्द्यांवर सभागृहात तीव्र चर्चा होण्याची शक्यता आहे.