मिळालेल्या माहितीनुसार, मयत विद्यार्थी दहावीत शिकत होता. आरोपी विद्यार्थी हा आठवीच्या वर्गात शिकत असून, त्याच्यावर जुन्या वादाच्या रागातून हा हल्ला केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. दोघांमध्ये काही दिवसांपासून क्रिकेट खेळण्यावरून भांडण सुरू होते. जेवणाच्या सुट्टीदरम्यान शाळेच्या परिसरात पुन्हा वाद उफाळला, आणि आठवीतील विद्यार्थ्याने चाकूने दहावीतील विद्यार्थ्यावर सपासप वार केले.
शाळेतील सीसीटीव्ही फुटेजमध्ये हा हल्ला कैद झाला असून, त्याच्या आधारे पोलिसांनी अवघ्या काही तासांतच आरोपी विद्यार्थ्याला ताब्यात घेतले. हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या विद्यार्थ्याला तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
पोलिसांचा तपास आणि कारवाई
घटनेची माहिती मिळताच तोफखाना पोलीस ठाण्याचे निरीक्षक आनंद कोकरे आणि शहर पोलीस उपअधीक्षक अमोल भारती यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी आरोपी विद्यार्थ्याला आणि त्याच्या एका मित्राला ताब्यात घेतले असून, त्यांची चौकशी सुरू आहे. या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.
ही घटना घडल्यानंतर शाळेत गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. शाळेतील कर्मचारी आणि इतर विद्यार्थ्यांनी जखमी अफानला रुग्णालयात नेण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याला वाचवता आले नाही. शाळा प्रशासनाने विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना धीर देण्याचा प्रयत्न केला, परंतु या घटनेने शालेय वातावरणावर गंभीर परिणाम झाला आहे.
या घटनेमुळे अहिल्यानगर शहरात खळबळ उडाली असून, शाळेतील सुरक्षाव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. शाळेत अशा प्रकारची हिंसक घटना घडण्यापर्यंत शिक्षक आणि कर्मचारी कुठे होते, असा सवाल पालक आणि स्थानिक नागरिकांकडून विचारला जात आहे.