- आढावा बैठकीत विविध विभागांकडून प्रलंबित विकासकामांना गती
पिंपरी चिंचवड - हिंजवडी आयटी पार्कमधून पुणे- पिंपरी-चिंचवड व ग्रामीण भागासह मुंबई- बंगळुरू महामार्गावर इन-आउटच्या ठिकाणी होणारी वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी आवश्यकतेनुसार अतिरिक्त वॉर्डन नियुक्ती करण्याची मागणी वाहतूक पोलीस प्रशासनाने करावी. त्यासाठी ‘पीएमआरडीए’ने मनुष्यबळ उपलब्ध करावे, असे आदेश विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी दिले आहेत.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या निर्देशानुसार, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी हिंजवडी आयटी पार्क आणि परिसर वाहतूक कोंडीमुक्त करण्यासाठी आज आढावा बैठक घेतली. यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, ‘पीएमआरडीए’चे महानगर आयुक्त योगेश म्हसे यांच्यासह महावितरण, एमआयडीसी, पीएमआडीए, जिल्हा प्रशासन, प्रदूषण नियंत्रण महामंडळ, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, पुणे प्रादेशिक परिवहन महामंडळ आदी शासकीय अस्थापनांचे अधिकारी उपस्थित होते.
भाजपा आमदार महेश लांडगे यांच्या पुढाकाराने आयटी फोरम, विविध सोसायटी फेडरेशनचे प्रतिनिधी आणि लोकप्रतिनिधी यांची नुकतीच मुंबई येथे विधानभवनमध्ये बैठक झाली होती. त्यावेळी हिंजवडी आणि परिसराच्या पायाभूत सोयी-सुविधा सक्षम करण्यासाठी ‘‘सिंगल पॉईंट ॲथॉरिटी’’ निश्चित केली. त्यानंतर 15 दिवसांतून एकदा आढावा बैठक घेण्याचे आदेश दिले आहे.
दरम्यान, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ आणि पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत प्रशासनाने अतिक्रमण विरोधी कारवाई सुरू केली. वाहतुकीला अडथळा ठरणारी बांधकामे, पत्राशेड हटवण्याची धडक मोहीम हाती घेतली. त्यानंतर आता रस्ते प्रशस्त करण्याच्या कामाला गती देण्यात येणार आहे.
विभागीय आयुक्तांनी केलेल्या सूचना…
1. प्रशासकीय कामांना दिरंगाई होत असेल, तर अधिकाऱ्यांनी आपल्या स्तरावर ‘ॲक्शन प्लॅन’ तयार करावा.
2. वाहतूक वाॅर्डन मागणी केल्यानुसार, पीएमआरडीए उपलब्ध करुन देईल. पुणे आणि पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तांनी तशी मागणी करावी.
3. महावितरणचे ट्रान्स्फार्मर आणि ओव्हर हेड वायर वाहतुकीला अडथळा ठरत असतील, तर ते स्थलांतरीत करणे.
4. वाहतूक समस्या निर्माण होणाऱ्या ठिकाणी आवश्यकतेनुसार ऐकेरी वाहतूक व्यवस्था करणे.
5. भूसंपादनाचे काम गतीमान करावे. शेतकऱ्यांना विश्वासात घेणे आणि रस्त्याची जागा ताब्यात घेणे.
6. पीएमपीएमएल बस थांबे योग्य ठिकाणी निश्चित करणे.
प्रतिक्रिया :
‘‘हिंजवडी आयटी पार्क’’ ची कोंडी सोडवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘‘सिंगल पॉईंट ॲथॉरिटी’’ निश्चित केली. सर्व शासकीय विभागांमधील समन्वय हा खूप महत्त्वाचा होता. वाहतुकीला अडथळा ठरणारी अनधिकृत बांधकामे आणि पत्राशेडवर प्रशासनाने कारवाई केली. त्यामुळे रस्ते प्रशस्त होतील. बेघर झालेल्या नागरिकांना हक्काचे घर देण्याची भूमिका प्रशासनाने ठेवावी. यासोबत भूसंपादनाच्या कामाला गती द्यावी. पायाभूत सोयी-सुविधा सक्षम करणे आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण संबंधित कामे मार्गी लावण्यासाठी ‘ॲक्शन प्लॅन’ तयार करावा, अशी मागणी आहे.
- महेश लांडगे, आमदार, भाजपा, पिंपरी-चिंचवड, पुणे