मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा चारोटी ते पालघर भव्य मोर्चा सुरू

 


मागण्या मान्य होईपर्यंत पालघरमध्ये अनिश्चित काळासाठी धरणे आंदोलनाचा निर्धार

पालघर (क्रांतीकुमार कडुलकर) : मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने (दि १९ जानेवारी) पालघर जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमधून आलेल्या सुमारे ५०,००० शेतकरी, कष्टकरी, कामगार, महिला व युवकांचा एक अतिभव्य पायी मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा डहाणू तालुक्यातील चारोटी येथून सुरू झाला असून, आज रात्री मनोर येथे मुक्काम करून उद्या पालघर जिल्हाधिकारी कार्यालयाकडे कूच करणार आहे.

सरकारने निश्चित कालमर्यादेसह लेखी स्वरूपात ज्वलंत व प्रलंबित मागण्या मान्य केल्याशिवाय, पालघर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अनिश्चित काळासाठी धरणे आंदोलन करण्याचा ठाम निर्धार मोर्चेकऱ्यांनी केला आहे.

या मोर्चामध्ये अखिल भारतीय किसान सभा (एआयकेएस), सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन्स (सीटू), अखिल भारतीय जनवादी महिला संघटना (एडवा), डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया (डीवायएफआय), स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (एसएफआय) तसेच आदिवासी अधिकार राष्ट्रीय मंच (एएआरएम) या संघटनांचा मोठ्या संख्येने सहभाग आहे.

मोर्चाचे नेतृत्व माकपचे पॉलिट ब्युरो सदस्य व एआयकेएसचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अशोक ढवळे, पॉलिट ब्युरो सदस्य व एडवाच्या राष्ट्रीय सरचिटणीस मरियम ढवळे, केंद्रीय समिती सदस्य, माकप राज्य सचिव व किसान सभेचे राष्ट्रीय सहसचिव डॉ. अजित नवले, केंद्रीय समिती सदस्य व सीटूचे राज्य सचिव तसेच डहाणूचे माजी आमदार विनोद निकोले, राज्य सचिवमंडळ सदस्य व एएआरएमचे राज्य निमंत्रक किरण गहला आदी करत आहेत.

उद्या सीपीएमचे पॉलिट ब्युरो सदस्य व अखिल भारतीय किसान सभेचे राष्ट्रीय सरचिटणीस विजू कृष्णन हेही या मोर्चात सहभागी होणार आहेत.





मोर्चाच्या प्रमुख मागण्या :

वनाधिकार कायद्याची कठोर व पूर्ण अंमलबजावणी करावी

देवस्थान, इनाम, वरकस व सरकारी जमिनी कसणाऱ्यांच्या नावावर कराव्यात

मोदी सरकारने रद्द केलेली मनरेगा योजना पूर्ववत सुरू करावी

स्मार्ट मीटर योजना तात्काळ रद्द करावी

पेसा कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करावी

चार श्रम संहिता रद्द कराव्यात

वाढवण व मुरबे बंदरांचे जनविरोधी प्रकल्प रद्द करावेत

पिण्याच्या पाण्यासह सिंचनासाठी पुरेशी पाण्याची सोय करावी.

शिक्षण, रोजगार, रेशन, आरोग्य आदी मूलभूत सुविधांमध्ये लक्षणीय वाढ करावी

थोडे नवीन जरा जुने