पिंपरी चिंचवड : चैतन्य विद्या प्रतिष्ठानच्या पेरिविंकल इंग्लिश मीडियम स्कूल (सूस शाखा) येथील इयत्ता अकरावीची विद्यार्थिनी सारंगी करंजावणे हिने ‘डर्ट ट्रॅक रेस 2026’ या प्रतिष्ठित मोटरस्पोर्ट्स स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करत मानाचा पुरस्कार पटकावला आहे. तिच्या या यशामुळे पेरिविंकल स्कूलसह संपूर्ण परिसरात अभिमानाची भावना व्यक्त होत आहे.
मोटरस्पोर्ट्ससारख्या आव्हानात्मक आणि साहसी क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करत सारंगीने आपल्या जिद्द, मेहनत आणि धाडसाच्या जोरावर हे यश संपादन केले आहे. तिच्या या कामगिरीची दखल घेत जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने तिला विशेष रेडिओ मुलाखतीसाठी आमंत्रित करण्यात आले आहे.
या यशाबद्दल बोलताना चैतन्य विद्या प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र बांदल यांनी सांगितले की, “विद्यार्थ्यांनी केवळ शैक्षणिक क्षेत्रातच नव्हे तर क्रीडा, साहस आणि विविध कौशल्यांच्या क्षेत्रातही आपली प्रतिभा दाखवणे आवश्यक आहे. सारंगीने दाखवलेले धाडस आणि जिद्द ही इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आहे. अशा विद्यार्थ्यांमुळे संस्थेचे नाव अधिक उज्ज्वल होते.
यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. निर्मल पंडित यांनीही सारंगीचे कौतुक करत सांगितले की, “सारंगीची मेहनत, चिकाटी आणि आत्मविश्वास यामुळे तिने हे यश संपादन केले आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीच्या क्षेत्रात सातत्याने प्रयत्न केले तर मोठी यशे मिळवता येतात, याचे हे उत्तम उदाहरण आहे.”
सारंगीच्या या उल्लेखनीय यशामागे शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. निर्मल पंडित यांचे मार्गदर्शन, तसेच पर्यवेक्षक सचिन खोडके, नेहा माळवदे, स्मिता श्रीवास्तव आणि शाळेतील शिक्षकवृंद यांचे प्रोत्साहन लाभले आहे.
सारंगीच्या कुटुंबीयांचाही तिच्या यशात मोठा वाटा आहे. तिचे वडील सचिन करंजावणे हे प्रसिद्ध बाईक रायडर असून त्यांनी अनेक देशांमध्ये रायडिंग स्पर्धांमध्ये सहभाग घेतला आहे. तिची आई उच्चशिक्षित असून एका खाजगी कंपनीत व्यवस्थापिका म्हणून कार्यरत आहेत. तसेच त्या मानवी हक्क संरक्षण आणि जागृती पिंपरी-चिंचवड शहर संघटनेच्या शहर अध्यक्षा म्हणूनही कार्यरत आहेत.
सारंगीच्या या कामगिरीमुळे पेरिविंकल स्कूलच्या विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून तिच्या कर्तृत्वाचा सर्वत्र गौरव होत आहे. शाळेचे व्यवस्थापन, शिक्षकवर्ग तसेच विद्यार्थ्यांनी तिचे मनःपूर्वक अभिनंदन केले असून भविष्यातही ती अशाच प्रकारे यशाची नवी शिखरे गाठेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
