चिंचवड (शिवानंद चौगुले) : पेठ क्रमांक १८, चिंचवड येथील श्रीमंत छत्रपती शिवाजी पार्क परिसरातील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात आयोजित करण्यात आलेल्या श्रीमद् भागवत कथा महोत्सवाचा अत्यंत उत्साहपूर्ण, भक्तिमय आणि मंगलमय वातावरणात समारोप करण्यात आला.
वृंदावन धाम येथून पधारलेले पूज्य श्री निरंजन भाईजी महाराज यांच्या अमृतमयी वाणीतून सात दिवस भागवत कथेचे निरूपण करण्यात आले. त्यांच्या प्रभावी प्रवचनातून भक्ती, संस्कार, मानवता, प्रेम, सदाचार आणि समाजप्रबोधनाचा संदेश भाविकांपर्यंत पोहोचला. महाराजांच्या ओजस्वी विचारांनी उपस्थितांच्या मनावर विशेष छाप पाडली.
समारोपाच्या दिवशी मंदिर परिसरात भक्तीचा अनोखा उत्सव अनुभवायला मिळाला. हरिनामाच्या गजरात माता-भगिनींनी आनंदाने नृत्य केले, तर टाळ-मृदंगाच्या निनादाने संपूर्ण परिसर भक्तिरसाने भारावून गेला. मोठ्या संख्येने उपस्थित भाविकांनी भागवत कथेचे श्रवण करून आध्यात्मिक समाधानाचा अनुभव घेतला.
या सात दिवसांच्या कथा महोत्सवामुळे अनेकांना जीवनमूल्ये, संस्कार आणि अध्यात्माची प्रेरणा मिळाली. भाविकांनी एकमेकांप्रती प्रेम, आपुलकी आणि बंधुभाव व्यक्त करत हा सोहळा संस्मरणीय बनविला.
समारोपानंतर महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. या महोत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी श्री विठ्ठल-रुक्मिणी प्रतिष्ठानचे पदाधिकारी, कार्यकर्ते, सेवेकरी तसेच सर्व भक्त परिवार यांनी परिश्रम घेतले. त्यांच्या कार्याबद्दल उपस्थितांनी कृतज्ञता व्यक्त केली.
भागवत कथेचे श्रवण हे केवळ धार्मिक विधी नसून जीवनाला संस्कार, मनाला शांती आणि समाजाला सुसंस्कारित करण्याचा दिव्य मार्ग असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
.png)
.png)