आळंदी (अर्जुन मेदनकर) : आळंदी नगरपरिषदेच्या वतीने माझी वसुंधरा अभियान ६ .० आणि स्वच्छ सर्वेक्षण २०२५ अंतर्गत पर्यावरणपूरक गणेशोत्सव जनजागृती कार्यशाळेत शाडू मातीपासून गणेश मूर्ती तयार करण्याचे प्रशिक्षण शालेय मुलांना उत्साहात देण्यात आले. यास शालेय मुलांनी मोठा प्रतिसाद देत कार्यशाळा उत्साही, आनंदी वातावरणात पार पडल्याचे मुख्याधिकारी माधव खांडेकर यांनी सांगितले.
आळंदी नगरपरिषद अंतर्गत "माझी वसुंधरा अभियान ६ .० " आणि "स्वच्छ सर्वेक्षण २०२५ " या उपक्रमांतर्गत पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याच्या उद्देशाने गणेशमूर्ती निर्मिती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेत लाल माती, शाडू माती पासून निसर्ग पर्यावरण पूरक गणेशमूर्ती बनविण्याचे प्रत्यक्ष प्रशिक्षण देण्यात आले. प्रसिद्ध मूर्तिकार शरद लोहार यांनी यावेळी मार्गदर्शन करत मूर्ती बनविण्याच्या तांत्रिक व सर्जनशील बाबी विद्यार्थ्यांना तसेच सहभागी नागरिकांना समजावून सांगितल्या. या कार्यशाळेस शालेय विद्यार्थी, महिला बचत गट सदस्य, पदाधिकारी, स्थानिक नागरिक यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत सहभाग घेतला. प्लास्टर ऑफ पॅरिस ऐवजी शाडू माती पासून मूर्ती बनवण्याचे महत्त्व आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश या उपक्रमातून प्रभावीपणे देण्यात आला.
कार्यशाळेत मुख्याधिकारी माधव खांडेकर यांनी मार्गदर्शन केले. “पर्यावरणपूरक सण साजरे करणे ही काळाची गरज आहे. कार्यशाळां तुन समाजात सकारात्मक बदल घडवता येऊ शकतो असे त्यांनी यावेळी सांगितले. हा उपक्रम आळंदीतील पर्यावरण जनजागृतीस महत्त्वपूर्ण पाऊल ठरला असून, भविष्यातही असे उपक्रम नगरपरिषदे मार्फत राबवले जाणार असल्याचे मुख्याधिकारी खांडेकर यांनी आवर्जून सांगितले.