संत रोहिदास महाराजांचे 'प्रबोधन पर्व' महापालिकेने साजरे करावे; डॉ. बाबा कांबळे यांची पिंपरी-चिंचवडमध्ये जोरदार मागणी


पिंपरी चिंचवड (क्रांतीकुमार कडुलकर) : "हरियाणात भाजप सरकारने संत रोहिदास महाराजांच्या स्मारकासाठी १२४ कोटी रुपये दिले, मग महाराष्ट्रात आणि पिंपरी-चिंचवडमध्येच उदासिनता का? महापालिकेतील काही जातीवादी अधिकारी प्रबोधन पर्वाची फाईल दाबून ठेवत असून, अशा अधिकाऱ्यांवर तातडीने कारवाई करावी आणि यंदापासून संत रोहिदास महाराज जयंतीनिमित्त 'प्रबोधन पर्व' भव्य स्वरूपात साजरे करावे," अशी परखड मागणी कष्टकरी जनता आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष व कष्टकऱ्यांचे नेते डॉ. बाबा कांबळे यांनी केली.

संत शिरोमणी रोहिदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त पिंपरी-चिंचवड महानगरपालिका मुख्यालयात आयोजित विशेष कार्यक्रमात ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. सकाळी १० वाजता झालेल्या या कार्यक्रमात डॉ. बाबा कांबळे यांनी प्रशासनाच्या ढिसाळ कारभारावर कडक शब्दांत ताशेरे ओढले.

डॉ. बाबा कांबळे यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे:

  हरियाणाचा आदर्श: हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सैनी यांनी ५ एकर जागा आणि १२४ कोटी रुपये खर्च करून 'संत रोहिदास महाराज धाम' उभारण्याची घोषणा केली आहे. त्या धर्तीवर महाराष्ट्रातही मोठ्या निर्णयांची गरज आहे.

 प्रशासकीय अडथळे: पिंपरी-चिंचवड महापालिका सर्व महापुरुषांचे 'प्रबोधन पर्व' साजरे करते. मात्र, संत रोहिदास महाराज प्रबोधन पर्वासाठी वारंवार पत्रव्यवहार करूनही काही अधिकारी जाणीवपूर्वक ही फाईल प्रलंबित ठेवत आहेत.

  जातीवादी अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी:

 "महानगरपालिकेत बसून महापुरुषांच्या कामात आडकाठी आणणारे हे जातीवादी अधिकारी कोण आहेत? त्यांचा शोध घेऊन प्रशासनाने त्यांच्यावर कठोर कारवाई करावी," असे आवाहन डॉ. बाबा कांबळे यांनी केले.



 भव्य आयोजनाची गरज:

 पिंपरी चौकात महापालिकेच्या वतीने संत रोहिदास महाराजांच्या जयंतीचे भव्य आयोजन करून समता, न्याय बंधुत्व श्रम आणि भक्तीचा संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचवावा.

पिंपरी चिंचवड महापालिकेत केलेल्या या कार्यक्रमाला पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे उपायुक्त अण्णा बोदडे, जनसंपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

 तसेच राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे  राष्ट्रीय महासचिव ज्ञानेश्वर कांबळे, वृक्ष प्राधिकरण समितीचे सदस्य गोरोबा गुजर, संतोष वाघमारे, दत्तात्रय शिंदे, प्रल्हाद कांबळे, विष्णू सातपुते, रामेश्वर पाचारणे, बाबा पोळ, सुनील कदम, सुरेश खाडे, पांडुरंग कांबळे, सूर्यकांत कुंडगीर, उत्तम मोरे, अभिमान साबळे, विजय कांबळे, कृष्णा साळवे, लखन गोलसर, आदी कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचा समारोप संत रोहिदास महाराजांच्या विचारांचा जयघोष करत करण्यात आला.


थोडे नवीन जरा जुने